Description
रावसाहेब जाधव यांच्या “एक गाव वेड्यांचं” या नाटकाला एक विलक्षण दुर्दिनकाळाचा आणि माणसाच्या सामूहिक मनोविकाराचा दस्तऐवज म्हणावे लागेल. हे केवळ विनोदी नाटक नाही, तर मानवी असहायतेचा, अंधश्रद्धेच्या काळोखाचा, आणि विवेकाच्या आक्रोशाचा एक वेगळा अनुभव आहे.
नाटकाची पहिलीच दृश्यमालिका मनाला हलवून टाकते, विघटलेल्या माणसांचे छायाचित्र उभे राहते, जिथे कोणाचा खिसा कुणाला माहित नाही आणि कुणाची ओळख कुणाला लागत नाही. ‘गंप्या’ आणि ‘रंग्या’सारखी पात्रे गोंधळलेल्या विचारांनी आणि जगण्याला पडलेल्या भेरुडाच्या उपमांनी नाटकाला अभिप्रायात्मक थरार देतात. या दोन पात्रांच्या संवादांमधून जी मानवी नग्नता ( शाब्दिक आणि रूपकात्मक) उलगडते, ती आपल्या काळजाला खोल चिरते.
वेडेपणाच्या संदर्भात नाटकाचा विनोद हा केवळ हास्यनिर्मिती करणारा नसून उपरोधिक, डार्क काळा आणि अस्वस्थ करणारा आहे. विनोद फुलवताना लेखक आधुनिक काळातील ‘डोपामाईनच्या प्रवाहात हरवणाऱ्या’ मानसशास्त्रीय संदर्भांचा वापर करतात.
नाटकात सतत एक ‘प्रतिमा विचार’ निर्माण होत राहतो, भूत म्हणजे विस्मृती, भूत म्हणजे असंवेदना, भूत म्हणजे आत्मवंचना. सई या पात्राच्या तोंडी आलेली ही वाक्ये खूप बोलकी आहेत:
“वेड्या माणसाला दिशा नसतात…
पण दहा दिशांना जाण्यासाठी दहा वाटा…
वाटांनाही फुटतात आणखी अशाच वाटा…”
ही भाषा कल्पनेला आगळा विस्तार देते. एका बाजूला जीर्ण विचारांचे, अंधश्रद्धेचे खाणे, तर दुसरीकडे एक प्रतिभावंत शिक्षक सुधाकर, त्यांच्या प्रयत्नांची हतबलता आणि आशेची शेवटची ठिणगी आहे. नाटकाचा केंद्रबिंदू म्हणून सुधाकरचे व्यक्तिमत्त्व महान होऊन दिसते. त्यांचा झगडा हे केवळ गावाच्या वेड्यांविरोधातील नाही, तर स्वःताच्या अस्तित्वाच्या उलगडणाऱ्या प्रश्नांशी असलेली एक लढाई आहे.
अत्यंत बोलकी रचनात्माकता ही की शेवटच्या प्रसंगांमध्ये सुधाकर स्वतःच्याच बळीची तयारी दाखवतो. हे दृश्य खूप प्रगल्भ प्रतीक बनते. ज्ञानाचा आणि विवेकाचा पराभव, लोकमानसाने उभ्या केलेल्या अंधश्रद्धेच्या देवळांमध्ये शहाणपणाचा बळी पडतो. नाटकाची शेवटची प्रतीमा हे ठळक सांगते की “माणसाला वेड्यांच्या समाजात शहाणे राहणे किती कठीण आहे.”
-सागर जाधव जोपुळकर










Reviews
There are no reviews yet.